Thursday, April 23, 2026

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक नियम लागू केले आहेत. या नियमांचा थेट परिणाम सीमापार प्रवास करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या भारतीय नागरिकांवर होणार आहे.

नवीन नियमांनुसार, भारतातून नेपाळमध्ये स्वतःची गाडी घेऊन जाणाऱ्या नागरिकांना आता वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा, संबंधित अधिकाऱ्यांकडून वाहन जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, भारतीय वाहनांना वर्षातून ३० दिवसांपेक्षा जास्त काळ नेपाळमध्ये थांबण्याची परवानगी नसणार आहे. अगदी अल्पकालीन भेटीसाठीदेखील आता शुल्क आकारले जात आहे. दररोज प्रवेश शुल्क लागू करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होऊ शकते.

खरेदीसंदर्भातही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नेपाळमधून १०० नेपाळी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल आणल्यास कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. अनेक कुटुंबांचे सदस्य भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांत विखुरलेले असल्यामुळे त्यांचा दैनंदिन व्यवहार यावर अवलंबून आहे. दक्षिण नेपाळातील अनेक नागरिक स्वस्त वस्तू खरेदीसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जात असत; मात्र आता त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे, अन्यथा माल जप्त केला जात आहे.

नवीन नियमांमुळे लहान दुकानदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण त्यांच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. दरम्यान, नेपाळ सरकारने या निर्णयामागे वाहनांचा गैरवापर रोखणे, करचोरीला आळा घालणे आणि देशांतर्गत उत्पादनांना चालना देणे हे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी भारतीय वाहनांना २४ तास विनाशुल्क सीमावर्ती भागात फिरण्याची मुभा होती; मात्र आता ही सवलत रद्द करून नियंत्रण अधिक कडक करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा