देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते पश्चिमेकडील जिल्ह्यांपर्यंत तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. बुधवारी (२२ एप्रिल) झारसुगुडामध्ये ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे देशातील सर्वाधिक होते. तर राजधानी भुवनेश्वरमध्येही पारा ४१.२ अंशांवर पोहोचला. हवामान विभागाने पुढील पाच दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
कोठे अलर्ट जारी?
गुरुवारी झारसुगुडा, संबलपूर आणि बोलांगीर जिल्ह्यांसाठी हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय १७ जिल्ह्यांना ‘यलो वॉर्निंग’ देण्यात आली आहे. यामध्ये गंजाम, गजपती, नयागड, खुर्दा, कटक, पुरी, केंद्रपाडा, जगतसिंहपूर, जाजपूर, भद्रक, बालासोर, अनुगुल, बौध, सोनपूर, सुंदरगड यांचा समावेश आहे.
टॉप ३ सर्वाधिक तापमान असलेली शहरे:
झारसुगुडा – ४४.६°C (देशात सर्वाधिक) ढेंकनाल – ४३.२°C भुवनेश्वर – ४१.२°C
सकाळी ८ नंतर बाहेर पडणे कठीण :
उष्णतेच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सकाळी ८ वाजल्यानंतर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. नागरिक आपापल्या कामाच्या वेळा बदलत असून, उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करत आहेत.
रस्ते ओस पडले; कामगारांवर मोठा परिणाम :
दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून फक्त अत्यावश्यक कामासाठीच लोक बाहेर पडत आहेत. विशेषतः मजूर, कारखान्यातील कामगार आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्यांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. वारंवार विश्रांती घेणे, पाणी पिणे आणि सावलीत थांबणे हीच त्यांची गरज बनली आहे.






