आगामी २२ जिल्हा परिषद आणि २२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली असून, २२ जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी पक्षाने आपली ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत १२ प्रमुख मंत्र्यांकडे २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे.
मागील निवडणुकांमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवल्यानंतर, आता पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. यासाठी प्रभावी प्रचारासह संघटनात्मक बांधणी, प्रशासनावर प्रभाव अशा त्रिस्तरीय रणनीतीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत ‘संपर्क मंत्री अभियान’ राबवण्यात येणार असून, प्रत्येक मंत्र्याला दोन जिल्ह्यांची जबाबदारी विभागून दिली आहे.
मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या आरोपामुळे राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ...
या नव्या जबाबदाऱ्यांनुसार, उत्तर महाराष्ट्रात गुलाबराव पाटील (जळगाव, नंदुरबार) आणि दादा भुसे (धुळे, बुलढाणा) खिंड लढवतील. उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहिल्यानगरची धुरा असेल, तर योगेश कदम ठाणे आणि पालघरमध्ये पक्षाचे वर्चस्व टिकवतील. मराठवाड्यात प्रकाश आबिटकर (नांदेड, हिंगोली) आणि आशिष जयस्वाल (जालना) काम पाहतील. विदर्भात संजय राठोड (यवतमाळ, वाशिम), संजय शिरसाट (भंडारा, गोंदिया), प्रतापराव जाधव (नागपूर, वर्धा) आणि शंभूराज देसाई (गडचिरोली, चंद्रपूर) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर पश्चिम महाराष्ट्र व इतर भागांसाठी प्रताप सरनाईक (अमरावती, अकोला) आणि भरतशेट गोगावले (बीड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरळीतील ‘जन आक्रोश’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा मुंबई : "महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून विरोधकांनी आपला ...
युतीधर्मातही मागे हटायचे नाही
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पालकमंत्री आहेत, तिथेही शिवसेनेने मागे न हटता शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून द्यावे, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडिसी) निधीतून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणे आणि प्रशासनावर प्रभाव निर्माण करून शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यावर भर
- संघटनात्मक बांधणीसाठी विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या, बीएलए याद्यांचे अद्ययावतीकरण आणि तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधणे आणि त्यांना संपूर्ण ताकद देणे ही या संपर्क मंत्र्यांची प्राथमिक जबाबदारी असणार आहे. - या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आनंदराव अडसूळ, प्रकाश पाटील, सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी यांसह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.






