Saturday, April 18, 2026

Priyanka Chaturvedi : महिला आरक्षणाविरोधात मतदान केल्याने ‘उबाठा’ गटात पहिले बंड

Priyanka Chaturvedi : महिला आरक्षणाविरोधात मतदान केल्याने ‘उबाठा’ गटात पहिले बंड

प्रियांका चतुर्वेदी पक्षांतराच्या तयारीत; पक्षाच्या भूमिकेवर उघडपणे केली टीका

मुंबई : नारी शक्ती वंदन विधेयकावरून संसदेत घडलेल्या अभूतपूर्व घडामोडींनंतर आता त्याचे पडसाद उबाठा गटात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाने लोकसभेत घेतलेल्या भूमिकेला थेट आव्हान देत माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी बंडाचे निशाण फडकवले असून, त्या लवकरच पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महिला आरक्षणाशी संबंधित १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर संसदेत मतदान झाले. या विधेयकाला २९८ मते मिळाली, तर २३० सदस्यांनी विरोधात कौल दिला. आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने हे विधेयक नामंजूर झाले. उबाठा गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते. मात्र, प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाची ही अधिकृत भूमिका झुगारून देत विधेयकाचे उघड समर्थन केले आहे.

"महिला आरक्षण विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. संसदेत किंवा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवू पाहणाऱ्या महिलांची यामुळे मोठी निराशा झाली आहे. मी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असून स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही. माझी भूमिका कुणाला मान्य नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे," अशा तिखट शब्दांत चतुर्वेदी यांनी आपले मत मांडले.

भाजप प्रवेशाची चर्चा

चतुर्वेदी यांच्या या भूमिकेमुळे उबाठा गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नुकताच प्रियांका चतुर्वेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला असून, त्यांना पुन्हा संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीने शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने चतुर्वेदी यांची संधी हुकली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यासाठी प्रयत्न करूनही अंतिम निर्णयावेळी त्यांना डावलण्यात आल्याने त्या आधीपासूनच नाराज होत्या. लवकरच त्या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment