Monday, August 3, 2026

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर पोहोचला असून मागील वर्षांच्या तुलनेत हा साठा अधिक जमा झालेला आहे. आतापर्यंत या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा हा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी होता. आजवर मागे असलेला पाणी साठ्याने आता त्यांनाही मागे टाकत बाजी मारली आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणीपातळी ही ९०.०६ टक्के एवढी झाली आहे. या सर्व धरणांमधील पाणी साठा आठ टक्यांवर जावून पोहोचला होता, त्यावेळी मागील वर्षीचा पाणीसाठा २५ टक्के होता. त्यामुळे कासवगतीने हा होईना मागील वर्षीच्या पुढे यंदाच्या पाणी साठ्याने बाजी मारल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Mumbai Water Supply)

महापालिकेच्या जलअभियंता विभागाने सोमवार दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी घेतलेल्या पाणी पातळीच्या नोंदीनुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरण तसेच तलावांमधील पाणी साठा १३ लाख०३ हजार ५०० दशलक्ष लिटर अर्थांत ९०.०६ टक्के होता. तर याच दिवशी मागील वर्षी म्हणजे सन २०२५मध्ये १२ लाख ८९ हजार ४५५ दशलक्ष लिटर अर्थांत ८९.०९ टक्के तसेच याच दिवशी सन २०२४मध्ये ११ लाख ८६ हजार १९७ अर्थात ८१.९६ टक्के एवढा पाणीसाठा हा वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत होता.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी हे तलाव तथा धरणे आधीच ओसंडून वाहू लागली आहेत. तर अप्पर वैतरणा ८० टक्के, मध्य वैतरणा ९२.१५ टक्के भरली आहेत, तर मुंबईतील सर्वांधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणांतील पाणी पातळी ही ८८.४३ टक्के एवढी आहे. त्यामुळे मुंबईचा पाणी पुरवठा हा सध्या मर्यादेतच असून आॅगस्ट आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाची रिझझिम झाली तरी उर्वरीत पाण्याचा साठा वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये जो पाऊस पडेल त्यातून दैनंदिन पाण्याची गरज आणि साठवण आदींचे गणित लक्षात घेता यंदाच्या पावसाळ्यात वर्षभराची तहान भागवण्या इतपत पाणी साठा तयार होईल असा विश्वास आहे. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे महापालिका पाणीकपात मागे घेण्याची कोणताही धोका पत्करणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत कपात कायमच राहणार असल्याचेही प्रशासनाकडून स्ष्ट केले जात आहे.

३ ऑगस्टपर्यंतचा मागील तीन वर्षांचा पाणीसाठा माहिती

सन २०२६ : १३ लाख०३ हजार ५०० दशलक्ष लिटर (९०.०६ टक्के)

सन २०२५ : १२ लाख ८९ हजार ४५५ दशलक्ष लिटर (८९.०९ टक्के)

सन २०२४ : ११ लाख ८६ हजार १९७ दशलक्ष लिटर (८१.९६ टक्के)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा