मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एकूण ६६ हजार ३१२ शेतकरी या अवकाळी संकटामुळे बाधित झाले असून, बळीराजाला दिलासा देण्यासाठी ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांची मदत मंजूर केल्याची माहिती मदतीचा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
शासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील विविध विभागांतील सुमारे ४९ हजार ५११.७२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने अमरावती विभागाला निसर्गाच्या कोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ५१ हजार ७२९ शेतकरी बाधित झाले आहेत. या विभागात तब्बल ४२ हजार ३८८.९७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यासाठी ४२३७.९७ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड, लातूर व बीड जिल्ह्यांमध्ये ८,५१५ शेतकरी बाधित झाले असून, तेथील ३,४९१.०३ हेक्टर क्षेत्रासाठी ४४४.०२ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे विभागांतर्गत सोलापूर व सातारा जिल्ह्यांमध्ये ४,५६४ शेतकरी बाधित झाले असून, ९६६.२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांसाठी ५७७.९३ लाख रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. विदर्भातील नागपूर विभागात वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांत १,५०४ शेतकऱ्यांचे ६६५.५२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असून, त्यासाठी ११३.१५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आहे.
पंचनामे तातडीने पूर्ण करा! : नुकसानग्रस्तांना ही मदत त्वरित मिळावी यासाठी प्रशासकीय यंत्रणेला पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मदत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग राखण्यावर शासनाचा विशेष भर असून, जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा सतत आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे पिकांचे नुकसान आणि घरांच्या पडझडीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन स्तरावर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.






