- १२ मे रोजी मतदान; संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या पदरात केवळ एकच जागा पडणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहातही विरोधकांची पीछेहाट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या १२ मे रोजी यासाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता, या निवड सत्ताधारी महायुतीचे वर्चस्व राहणार असून, महाविकास आघाडीला ९ पैकी केवळ एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
या निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. तर, ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १२ मे रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याशिवाय नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी- शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. विधानसभेत महायुतीचे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे प्रचंड संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीनंतर महायुतीच्या खात्यात आणखी दोन आमदारांची भर पडणार असल्याने ९ पैकी ७ जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे. एका जागेमुळे मविआत पेच :
महाविकास आघाडीकडे सध्या एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. एका जागेसाठी लागणारा कोटा पाहता मविआचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र, दुसऱ्या जागेसाठी त्यांना किमान १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. राज्यसभेच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, यावेळी शरद पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची शक्यता असून, ही एकमेव जागा ‘उबाठा’ गटाच्या पदरात पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी :
भाजप आपल्या रिक्त होणाऱ्या जागांच्या तुलनेत अधिक जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. पक्षाकडून केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते यांच्या नावांची चर्चा सुरू असून, अनेक माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
निवडणूक कार्यक्रम असा
अधिसूचना : २३ एप्रिल २०२६ अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२६ अर्जांची छाननी : २ मे २०२६ अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ मे २०२६ मतदान : १२ मे २०२६ (सकाळी ९ ते ४) निकाल : १२ मे २०२६ (संध्याकाळी ५ वाजता)






