Wednesday, April 15, 2026

Nari Shakti Vandan Adhiniyam : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक भारताचे भविष्य बदलेल

Nari Shakti Vandan Adhiniyam : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक भारताचे भविष्य बदलेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; महिला खासदारांची संख्या ४० टक्के पार होणार

मुंबई : मोदी सरकारने आणलेले ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक देशाच्या लोकशाहीला नवे वळण देणारी ‘वॉटरशेड मूव्हमेंट’ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला. या आरक्षणामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांची संख्या ३३ टक्क्यांवर मर्यादित न राहता, ती ४० टक्क्यांचा टप्पा ओलांडेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

दादर येथील योगी सभागृहात आयोजित ‘नारी शक्ती वंदन महिला संमेलना’त मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री पद्मश्री रवीना टंडन, वैशाली सामंत, प्राजक्ता माळी, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, माजी महापौर रितू तावडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, "यापूर्वी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या काळातही आरक्षणाचे प्रयत्न झाले. मात्र, तत्कालीन घटक पक्षांचा विरोध आणि अन्य कारणांमुळे हे विधेयक प्रलंबित राहिले. पंतप्रधान मोदींनी मात्र ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’पासून सुरू केलेला प्रवास आता महिलांना संसदेत हक्काचे स्थान देण्यापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवला आहे."

जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे आरक्षण लांबणीवर पडेल, असा संभ्रम विरोधक पसरवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले की, "२०११ च्या जनगणनेच्या आधारावरच ही प्रक्रिया राबवली जाणार असून २०२९ च्या निवडणुकीत लोकसभेत महिला खासदारांचा आकडा थेट २७३ वर पोहोचलेला दिसेल. सध्या जिथे आरक्षण नाही, तिथेही महिला स्वबळावर निवडून येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व ४० टक्क्यांच्या पुढे जाईल."

प्रगत भारताचे शुभसंकेत : महाराष्ट्रात मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, वन प्रमुख आणि मुंबई महापालिका आयुक्त यांसारख्या सर्वोच्च पदांवर महिलांची नियुक्ती ही आरक्षणामुळे नव्हे, तर त्यांच्या सक्षमतेमुळे झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असताना प्रत्यक्षात ५५ ते ५९ टक्के महिला निवडून येत आहेत. आता ‘सरपंच पती’ किंवा ‘नगरसेविका पती’ ही संकल्पना इतिहासजमा झाली असून महिला स्वतः खंबीर नेतृत्व करत आहेत. विद्यापीठांच्या पदवीदान समारंभात मुलीच सर्वाधिक सुवर्णपदके पटकावत आहेत, हे नव्या प्रगत भारताचे शुभसंकेत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विरोधकांना दिला इशारा : "काही लोक तांत्रिक कारणांचा आधार घेत छुप्या पद्धतीने या विधेयकाला विरोध करत आहेत, त्यांचा खरा चेहरा लवकरच जनतेसमोर येईल," असा इशारा फडणवीस यांनी दिला. या विधेयकासाठी आपण राज्यातील सर्व पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून पाठिंब्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. केवळ भाषणात नारी सशक्तीकरणाच्या गप्पा न मारता कृतीत आणण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment