पहिल्या कोळसा रेल्वे रॅकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत
मुंबई : राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेच्या दिशेने सोमवारी एक ऐतिहासिक पाऊल पडले असून, छत्तीसगडमधील महानिर्मितीच्या मालकीच्या 'गारे पालमा' खाणीतून कोळशाची पहिली रेल्वे रॅक कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पहिल्या कोळसा रॅकचे उत्साहात स्वागत केले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी उभारी मिळणार असून, विदर्भाला राज्याचे 'ऊर्जा केंद्र' म्हणून विकसित करण्याच्या स्वप्नाला बळ मिळाले आहे.
छत्तीसगड येथील गारे पालमा सेक्टर-२ या कोळसा खाणीतून आलेल्या या पहिल्या रेल्वे रॅकचे आगमन ऊर्जा स्वावलंबनाच्या प्रवासातील निर्णायक टप्पा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोळसा हाताळणी प्रकल्पाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या खाणीचे महत्त्व विशद करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गारे पालमा या खाणीतून अत्यंत उच्च दर्जाचा कोळसा उपलब्ध होत आहे. या उच्च गुणवत्तेमुळे वीजनिर्मितीची क्षमता तर वाढणारच आहे, शिवाय ऊर्जेसाठी लागणाऱ्या कोळशाचे प्रमाणही पूर्वीपेक्षा कमी होणार आहे. "पुढील ७७ वर्षे राज्याला या खाणीतून उच्च दर्जाचा कोळसा मिळत राहणार आहे. यामुळे भविष्यातील वीज तुटवड्याचा धोका कायमचा टळणार असून हे दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजेचे दर कमी होणार
- उच्च दर्जाच्या कोळशामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच वीज निर्मितीचा खर्च कमी होणार आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरात कपातीच्या माध्यमातून होणार आहे. तसेच, राज्यातील लोडशेडिंगची समस्या दूर करून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे आता अधिक सुलभ होणार आहे.
- दुसरे म्हणजे, या खाणीतून कोराडीसह चंद्रपूर आणि परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रांना दीर्घकालीन कोळसा पुरवठा केला जाणार आहे. महाऊर्जाला मिळालेली ही खाण राज्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला गती देणारी ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.