मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांना काल (शनिवार ११ एप्रिल २०२६) हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसलेंची नात झानई भोसले हिने इन्स्टा पोस्ट करून आजी ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले होते.
अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठी भाषेतून आशाताईंना आदरांजली वाहिली आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन.
त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील.
पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अशा भोसले यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
काय म्हणाले अमित शहा ?
आज प्रत्येक भारतीयासाठी आणि विशेषतः माझ्यासारख्या प्रत्येक संगीतप्रेमीसाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे, कारण आपली सर्वांची लाडकी Asha Bhosle आपल्यात राहिलेल्या नाहीत।
आशाताईंनी केवळ आपल्या मधुर आवाजाने आणि अद्वितीय प्रतिभेने वेगळी ओळख निर्माण केली नाही, तर आपल्या सुरांनी भारतीय संगीत अधिक समृद्ध केले। कोणत्याही प्रकारच्या संगीताशी जुळवून घेण्याची त्यांची विलक्षण क्षमता प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालत असे। आपल्या आवाजाने कोट्यवधी हृदयांना स्पर्श करणाऱ्या आशाजींनी हिंदी, मराठी, बांग्ला, तमिळ, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये तसेच लोकगीतांमध्येही आपली अमिट छाप सोडली।
आशाताईंच्या आवाजात जितकी कोमलता होती, तितकीच त्यांच्या स्वभावात साधेपणा आणि आत्मीयता होती। त्यांची भेट झाली की संगीत आणि कलेसारख्या अनेक विषयांवर दीर्घ संवाद व्हायचा। आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या स्वरांमुळे त्या सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील।
ईश्वर आशाजींना आपल्या श्रीचरणी स्थान देवो। त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना। ॐ शांती शांती शांती
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ :
भारतीय संगीतविश्वातील स्वरसम्राज्ञी, महान सुरसाधिका आणि ‘पद्मविभूषण’ अशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून कला क्षेत्रासाठी ही अपूरणीय हानी आहे. त्यांच्या अद्वितीय गायकीने भारतीय संगीताला नवी उंची प्राप्त करून दिली. त्यांचे मधुर स्वर सदैव देशवासियांच्या मनात घुमत राहतील. प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना आहे की दिवंगत पुण्यात्म्यास सद्गती लाभो आणि शोकाकुल कुटुंबीय तसेच चाहत्यांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ॐ शांती!