नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून देशातील लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिलांशी विज्ञान भवन येथे संवाद साधणार आहेत. भारताला २०४७ पर्यंत विकसित करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वात करायच्या कामांविषयी चर्चा करणार आहेत. देशाच्या विकास कार्यक्रमात महिलांचा अधिकाधिक सहभाग असावा याच विचारातून पंतप्रधान मोदी लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार आहेत. नारी शक्ती वंदन संमेलनात प्रशासन, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, उद्योजकता, प्रसारमाध्यमे, समाजसेवा, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील लोकप्रिय तसेच कर्तृत्ववान महिला सहभागी होणार आहेत.
देशाच्या संसदेने सप्टेंबर २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक मंजूर केले. हे करताना महिलांचे आरक्षण नवीन जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडले होते. कोरोना संकटामुळे जनगणनेला विलंब झाल्याने २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात महिला आरक्षण लागू करण्यासाठी गुरुवार ते शनिवार, १६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात नवे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नारी शक्ती वंदन संमेलन होणार आहे.
भारताच्या विकास कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तसेच या कार्यक्रमातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ग्रामीण प्रशासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंचायतींपासून ते देशाच्या संसदेपर्यंत सर्व पातळ्यांवर प्रशासन आणि नेतृत्वामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. देशाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक आहे, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. सरकारची ही भूमिका आणि त्यामागील कारणं समजावून सांगण्यासाठी नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.