महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी
मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा. यासाठी ई-कचऱ्याचे उगमस्थानीच वर्गीकरण सक्तीचे करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशाप्रकारे अंमलबजावणी करून सक्ती केल्यास ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि पुनर्वापर सुलभ होऊन पर्यायाने पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल असे विश्वास व्यक्त केला जात आहे.
भाजपचे नगरसेवक तेजिंदरसिंग तिवाना यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, जागतिक शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये ई-कचऱ्याचे प्रमाण वेगाने वाढत असून, यामागे बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या तसेच नागरिकांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलांचा मोठा वाटा आहे. मात्र, योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे या कचऱ्यामुळे गंभीर धोके निर्माण होत आहेत.
ई-कचऱ्यातील लिथियम बॅटरी, सर्किट बोर्ड यांसारखी धोकादायक उपसाधने सध्या सुक्या कचऱ्यात मिसळली जातात. परिणामी, कचरा डेपोमध्ये वारंवार आगी लागून त्या अनेक दिवस धुमसत राहतात. या आगीमधून निर्माण होणाऱ्या विषारी वायूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आले असल्याचा दाखला देत तिवाना यांनी या पार्श्वभूमीवर, ओला आणि सुका कचरा जसा वेगळा गोळा केला जातो, त्याच धर्तीवर ई-कचऱ्याचेही उगमस्थानी वर्गीकरण करणे अनिवार्य करण्यात यावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
या ई कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेने ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी, कार्यप्रणाली आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नेमून संपूर्ण व्यवस्थापन स्वतःकडे घेण्याचीही सूचना केली आहे. या निर्णयामुळे ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट आणि पुनर्वापर सुलभ होऊन पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही तिवाना यांनी व्यक्त केली आहे.