मुंबई : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त दि. ५ ते १२ एप्रिल याकाळात रोजी राज्यभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, ६ एप्रिलला ५१ लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यावेळी उपस्थित होते. स्थापना दिनानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, अन्य लोकप्रतिनिधी जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या निमिताने राष्ट्रवादी विचारांचा उत्सव साजरा होईल, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.
दि. एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे. या निमित्त २८८ विधानसभा मतदारसंघात, ३६ जिल्ह्यात आणि राज्यातील १ लाख बुथवर स्थापना दिनाचे कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक बुथवर वॉल पेंटिंग, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार, सक्रीय कार्यकर्त्यांचे मेळावे, समाजातील नामवंत व्यक्तींशी संपर्क, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क असे कार्यक्रम होणार आहेत. वॉल पेंटिंग मध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते आपापल्या मतदारसंघात वॉल पेंटिंग मध्ये सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती घरोघरी पोहचवण्यात येणार आहे. पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवणार आहेत.
एकूण ५१ लाख घरांवर फडकणार भाजपचा झेंडा : यंदा ६ एप्रिल रोजी राज्यातील ५१ लाख घरांवर भाजपचा झेंडा फडकावला जाईल. तसेच पक्षाच्या आजवरच्या वाटचालीनिमित्त तयार करण्यात आलेला माहितीपट दाखविण्यात येणार आहे. दोन खासदारांपासून जगातील सर्वात मोठ्या पक्षापर्यंतचा भारतीय जनता पार्टीचा प्रवास यातून उलगडला जाणार आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील १ हजार २०० मंडलांमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. या बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व अन्य प्रमुख नेते, मंत्री ६ व ७ एप्रिल रोजी पक्ष कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधतील. सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम होईल. गाव चलो, वस्ती चलो या कार्यक्रमांतून पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते जनसंपर्क अभियान राबविणार आहेत, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली.






