मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त घटना देखील चर्चेत आली. गुजरातचा स्टार फलंदाज राहुल तेवतीया (Rahul Tewatia) याला ऐन सामन्यातच आपली बॅट बदलावी लागली, आणि त्यामुळे काही काळ सामना थांबला.
बॅट का बदलावी लागली?
सामन्यादरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी तेवतियाच्या बॅटची तपासणी केली. ही बॅट निर्धारित मापांपेक्षा मोठी असल्याचं आढळून आलं. आयपीएलमध्ये यंदापासून बॅटच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार बॅटची जाडी आणि रुंदी ठराविक मर्यादेत असणं आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे तेवतियाला तात्काळ बॅट बदलण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे मैदानावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सामन्याचा आढावा :
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत गुजरातला २० षटकांत १६२ धावांवर रोखलं. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिल Shubman Gill (३९) आणि जॉस बटलर Jos Buttler (३८) यांनी महत्त्वपूर्ण धावा केल्या. पंजाबकडून युजवेंद्र चहल आणि मार्को यानसन यांनी प्रभावी गोलंदाजी करत गुजरातच्या डावाला लगाम घातला.
वादामुळे वाढली चर्चा :
सामन्यातील या बॅट प्रकरणामुळे आयपीएलमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुढील सामन्यांमध्ये अशा तपासण्या आणखी कडक होण्याची शक्यता असून, खेळाडूंना नियमांचे पालन करण्याबाबत अधिक सतर्क राहावं लागणार आहे.