मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची पद्धत आहे. पण २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. पूर्ण राज्यात एकसमान शैक्षणिक वेळापत्रक सुरू ठेवण्याच्या उद्देशाने हा बदल केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळांना २ मे २०२६ पासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
यंदा विदर्भासह सर्व विभागांतील शाळा १५ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जून पासून होणार आहे. राज्यातील सर्व विभागांतील शाळांनी याच तारखेपासून नियमित अध्यापनास प्रारंभ करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
विदर्भातील शाळा १५ ते २७ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरतील. हा अपवाद राज्याच्या उर्वरित भागांसाठी केला जाणार नाही. पण ३० जूनपासून राज्यातील सर्व शाळा नियमित वेळेनुसार भरतील.
राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांमध्ये २ मेपासून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी लागू होईल. दरम्यान, इतर मंडळांच्या काही शाळांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार किंवा शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळा सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.