मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना चांगलाच इंगा दाखवतात. मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून होणारे वादही मनसे स्टाईलने सोडवले जात असल्याचं पाहायला मिळतं. घाटकोपर येथील मराठी तरुणीलाही मनसेनं मदत केल्याचं समोर आलं आहे. अश्विनी घाडगे असं या मराठी मुलीचं नाव आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,घाटकोपरमधील सेराब्रस कन्सल्टिंग (Cerabrus Consulting) नावाच्या कंपनीकडून मराठी तरुणी अश्विनी घाडगेला ३ महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता. कंपनीचे लोक अश्विनीला त्रास द्यायचे. त्यानंतर तिने नोकरी सोडून दिल्यावर तिचा तीन महिन्यांचा पगार थकवण्यात आला.
तरुणीसह कुटुंबीयांनी मानले राज ठाकरेंचे आभार
कंपनीच्या मालकांनी पगार थकवल्याने मनसेनं ठिय्या आंदोलन केलं. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर अश्विनीच्या खात्यात पगार जमा झाला. त्यानंतर अश्विनी आणि तिच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.