नवी दिल्ली : सिंगापूर कोरोनर कोर्टाने प्रसिद्ध आसामी गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी आपला अंतिम निकाल दिला असून, त्यांचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाच्या निष्कर्षानुसार, या प्रकरणाचा सखोल तपास आणि उपलब्ध पुराव्यांवरून मृत्यूचे कारण बुडणे हेच असल्याचे निश्चित झाले आहे. कोरोनरने हे देखील स्पष्ट केले की हा एक अपघाती मृत्यू होता.या निकालामुळे या प्रकरणाभोवतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की यात कोणताही कट किंवा गुन्हेगारी पैलू सामील नव्हता. पुढील तपशील अपेक्षित आहेत.
विशेष म्हणजे, आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून डिसेंबर २०२५ मध्ये गुवाहाटी न्यायालयात गायकाच्या मृत्यू प्रकरणी सविस्तर आरोपपत्र दाखल केले होते.
१९ सप्टेंबर, २०२५ रोजी सिंगापूरमध्ये झुबीन गर्ग यांच्या रहस्यमय मृत्यूनंतर तपास सुरू झाला. नॉर्थईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला जात असताना सागरी प्रवासात गर्ग यांचा मृत्यू झाला.
गुवाहाटी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सात जणांची नावे आहेत. त्यापैकी, फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता, झुबीनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, बँड सदस्य शेखरज्योती गोस्वामी आणि सह-गायिका अमृतप्रभा महंता यांच्यासह चौघांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. जुबीन गर्ग यांचे चुलत भाऊ आणि निलंबित आसाम पोलीस अधिकारी संदीपान गर्ग यांच्यावर 'सदोष मनुष्यवध' केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्रात गर्ग यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याचेही नाव आहे.