मुंबई: मुंबईत सध्या मोठ्याप्रमाणात समुद्रातील कचरा आणि मलमिश्रित पाणी जात असल्यामुळे नगरसेवकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. समुद्रातील या प्रदुषित पाणी आणि कचऱ्यामुळे मच्छिमारांना मासे मिळत नसून प्रत्येक बोटींमध्ये मासे कमी आणि कचराच जास्त मिळत असल्याची तक्रारी नगरसेवकांनी मांडली. दरम्यान नाल्यातील कचरा थेट समुद्रात जात असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याने यासाठी नाल्याच्या दोन्ही बाजुला जाळ्या लावून कचरा अडवण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन महापालिका सभागृहात प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.
खारदांडा येथील उबाठाचे नगरसेवक चिंतामणी निवाटे यांनी ६६ ब अन्वये मुंबईतील तमाम मासेमारी करणारे कोळीबांधव आणि जलसृष्टी यांना निर्माण झालेला धोका तसेच यावरील उपाययोजना यावर मुद्दा उपस्थित केला. निवाटे यांनी खारदांडा येथील गजधरबांध उदंचन केंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे मलनि:सारण वाहिन्यांमधून येणारे मलमिश्रित पाणी व कचरा आणि पर्जन्य जलवाहिन्यांमधून येणारा कचरा तसेच समुद्रात प्रक्रिया न केलेले पाणी सोडल्यामुळे हा धोका निर्माण झाल्याचे सांगत कोळी बांधवांचे नुकसान होत आहे. कोळ्यांच्या ट्रॉलर्समधून मासे कमी येत असून कचराच अधिक जाळ्यात अडकला जाताे,असे सांगितले. मात्र, मासेमारी कमी झाल्यामुळे कोणीही कोळी बांधव इतर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करत नाही,असे सांगत त्यांनी किमान मच्छिमारांच्या व्यवसायाला धोका पोहोचू नये अशी मागणी त्यांनी केली.
यावर भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी हा विषय अतिशय गंभीर असून गजधरांध पंपिंग स्टेशन कार्यरत असून नाल्याच्या ठिकाणी लावलेले ट्रॅशबुम्सची सेवा बंद आहे. त्यामुळे न नवीन कंत्राटदाराची निवड होईपर्यंत जुन्याच कंत्राटदाराला काम देवून ही सेवा सुरु करावी अशी सूचना केली. तर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी समुद्राची स्वच्छता दिसून कोळीवाडयांची स्वच्छताही व्हायला हवी. त्यामुळे महापौरांनी सर्व कोळीवाड्यांची पाहणी करावी अशी मागणी केली.
काँग्रेसच्या संगीता कोळी यांनी समुद्रात मत्सशेती कोळी बांधव करत असतात. पूर्वी समुद्रातून मासेमारी करून बोटी आल्यानंतर प्रत्येक मासळीची वर्गवारी करण्यासाठी वेगवेगळ्या टोपल्या ठेवल्या जायच्या. आता यासाठी आणखी एक टोपली ठेवावी लागते. यामध्ये कचरा वेगळा करावा लागतो. त्यामुळे माशांच्या तुलनेत कचराच अधिक असतो,असे सांगितले. त्यामुळे समुद्रात मासे मिळत नाही, त्यामुळे मासे विक्रीला आमच्या भगिनी निघाल्या तर त्यांना मार्केटमध्ये जागा नाही अशी परिस्थती सध्या आहे अशी व्यथा मांडली. तर भाजपच्या योगिता कोळी यांनी याचे समर्थन करताना आज सी फुड सर्वांत जास्त खाल्ले जाते असे सांगत समुद्रातील प्रदुषित पाणी, कचरा यामुळे मासेमारी होत नाही.आधीच चार महिना मासेमारी बंद असते आणि आठ महिन्यांमध्ये मत्सदृष्काळ निर्माण होतो. त्यामुळे कोळी बांधवांच्या व्यवसायाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून प्रशासनाने याची तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले
तर माजी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी शिवाजीपार्क,दादरच्या समुद्रात पूर्वी शिंपल्या काढल्या जायच्या, परंतु मिठी नदीच्या प्रदुषित पाण्यामुळे सध्या तिथे शिंपले मिळत नाही, मासे मिळत नाही,असे सांगत या समुद्रात गणेश विसर्जनामुळे चार फुटांपर्यंत पीओपीच्या थर गणेश विसर्जन मूर्तींमुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्रात मलनि:सारण वाहिन्यांमधील प्रक्रिया केलेले पाणी किती शुध्द करून समुद्रात सोडले जाते यावर सर्व अवलंबून असून जर ते पूर्ण प्रक्रिया केलेले नसेल तर जलचर प्राणी कसे जिवंत राहणार असा प्रश्न उपस्थित केला. तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी समुद्राच्या सुरुवातीच्या पाण्यात खेंगार मिळते, तेही आता मिळत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन याकडे का दुर्लक्ष करते असा असा सवाल केला. यावेळी झालेल्या चर्चेत भाजपच्या जागृती पाटील, काँग्रेसचे अश्रफ आझमी, रुक्साना पारथ आदींनी चर्चेत भाग घेतला होता.
यावेळी प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी एस एन डी टी नाला आणि मेन ऍव्हेन्यू नाल्यातील पाण्यावर गझधरबांध पंपिंग स्टेशनद्वारे समुद्रात सोडले जाते. त्यामुळे हे पंपिंग स्टेशन सध्या कार्यतर असून या दोन्ही नाल्यांच्या शेवटला ट्रॅशबुम्स बसवण्यात आले होते. या यंत्रणेचा कालावधी हा फेब्रुवारी २० २६पर्यंत होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. पण यात एकच कंत्राटदार पात्र ठरल्यामुळे पुन्हा निविदा मागवण्यात आली आहे. जर त्यामध्ये कोणीही न आल्यास जुन्या कंत्राटदार कपंनीला मुदतवाढ दिली जाईल. मात्र, या दोन्ही नाल्यांच्या सुरुवातीला ७ ते ८ फुटांच्या जाळ्या बसवण्याचा विचार आहे. तर सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सात मलजल प्रक्रिया केंद्रातील २ प्रकल्प या वर्षी आणि दोन प्रकल्प पुढील वर्षी तसेच एक प्रकल्प त्या पुढील वर्षी पूर्ण केले जाईल, ज्यामुळे दृत्तीय स्तर प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडले जाईल, ज्यामुळे समुद्रातील जलप्रदुषण कमी होवून जलचर प्राण्यांचे संवर्धन होईल,असे सांगितले.