तीन कामासाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी दाखवले स्वारस्य
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे येत नसल्यामुळे मिठीची सफाईच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. आजवर केलेल्या निविदा प्रक्रियेत एकही कंपनी पुढे येत नसल्याने हे पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत करायचे का या विचारात असतानाच या कामासाठी अखेर महापालिकेला कंत्राटदार पावले. मिठी नदीच्या तीन भागातील कामांसाठी मागवलेल्या गाळ काढण्याच्या निविदेसाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.
मिठी नदीच्या कामासाठी यापूर्वी नेमलेल्या तीन पैकी दोन कंपन्यांवर गुन्हा दाखल असून एका कंपनीला कळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे मिठी नदीसह एस विभाग आणि एम पश्चिम विभागातील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने जुन्या निवायदा अटी वगळून सुधारित अटीनुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या.आजवर यासाठी मुदतवाढ देऊनही याला कोणत्याही कंपनीच्या वतीने प्रतिसाद दिला जात नव्हता.त्यामुळे अखेर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने यांत्रिक सेवा भाडेतत्वावर तसेच रोजगार संस्थांकडून मनुष्यबळाची सेवा पुरवून ही सफाई पूर्ण करण्याचा विचार केला होता. परंतु निविदा भरण्याची मंगळवारी शेवटची तारीख होती आणि सायंकाळी पर्यंत मिठी नदीच्या तीन भागातील कामांसाठी प्रत्येकी दोन कंपन्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या कंपन्या कोण आहेत आणि त्यांनी दर आकाराला आहे याची माहिती निविदा प्रक्रिया अंतिम केल्यानंतर स्पष्ट होईल. परंतु, तूर्तास तरी मिठी नदीच्या कामासाठी कंपन्या पुढे आल्याची माहिती समोर येत आहे.
मिठी नदीतील गाळ काढणे तथा स्वच्छता करणे
फिल्टरपाडा, पवई ते टीचर्स कॉलनी आउटफॉल, कुर्ला
निविदा प्राप्त: ०२
टीचर्स कॉलनी, कुर्ला ते न्यू बीकेसी कनेक्टर ब्रिज
निविदा प्राप्त: ०२
न्यू बीकेसी कनेक्टर ब्रिज ते माहिम कॉजवे आणि त्याचे उपनाले
निविदा प्राप्त: ०२