नवी मुंबई: नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेवर तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा खोटा आरोप करत त्यांच्या पालकांकडून पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दोन निष्पाप विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर मोबाईल चोरीचा आरोप केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना वारंवार मानसिक दबावाखाली ठेवत त्यांच्या आईकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर “पैसे दिले नाहीत तर मुलांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही,” अशी धमकीही देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सततच्या दबावामुळे आणि भीतीमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला.
२ विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल
या मानसिक तणावातून दोन विद्यार्थ्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पालक, नागरिक आणि सामाजिक संघटनांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण, धमक्या आणि अन्यायकारक वागणूक यामुळे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचे हे भीषण उदाहरण मानले जात आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिकेवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शाळा प्रशासनाचीही सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.