कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच रविवार २२ मार्च रोजी पुण्यातील वाघोली येथे रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ कोण ठरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आज मॅट आणि माती अशा दोन गटांत हे अंतिम सामने पार पडणार आहेत. मॅट गटात हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात जोरदार लढत अपेक्षित आहे. तर माती गटात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड आमनेसामने येणार आहेत.
विशेष म्हणजे, सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर हे दोघेही यापूर्वी ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकलेले आहेत. त्यामुळे यंदा त्यांच्यापैकी कोणी जिंकल्यास ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळणार आहे.
विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव :
यंदाच्या विजेत्या मल्लासाठी मोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. विजेत्याला मानाची गदा देण्यात येणार असून, याशिवाय आलिशान टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) कार आणि ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
या भव्य समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा प्रदान केली जाणार आहे.