बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना ठाणे येथे बदल करून हार्बर मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ आणि गर्दी दोन्ही वाढतात. नव्या प्रकल्पामुळे हा त्रास कमी होणार आहे. या प्रस्तावानुसार बदलापूर आणि वांगणीदरम्यान कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याची योजना असून, तेथून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत नवीन मार्ग विकसित करण्याचा विचार आहे. या प्रस्तावालाही तत्त्वतः मान्यता देण्यात आली असून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे समजते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक स्तरावरूनही या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. आता रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.