नवी मुंबई : नेरूळ सेक्टर-६० येथील फ्लेमिंगो अभयारण्यालगत प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला असून संबंधित प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी सिडको, नगरविकास विभाग, सीआरझेड प्राधिकरण, रेरा आणि राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण यांना पत्रे पाठवून दाद मागितली आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिस्त्री कन्स्ट्रक्शन कंपनीने महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणासमोर सादर केलेला प्रस्ताव ‘प्रकल्पाच्या नियोजनात बदल’ झाल्याचे कारण देत मागे घेतला आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या जागेवर नैसर्गिक जलसाठा असल्याचे समोर आले असून, अशा संवेदनशील क्षेत्रात बांधकामास परवानगी देऊ नये, असा ठाम पवित्रा पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. भविष्यात कोणत्याही बदलासह हा प्रकल्प पुन्हा राबवू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.