ठरावीक भागांमध्ये कारवाई, इतर ठिकाणी फेरीवाल्यांचे धंदे तेजीत
मुंबई : मुंबईतील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिल्यानंतर प्रत्यक्षात मुंबईतील अनेक भागांमध्ये कारवाईमध्ये दुटप्पी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही महापालिकेचे काही सहायक आयुक्त हे या कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाईचा परिणाम दिसून येतो, तर काही भागांमध्ये सर्रासपणे फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवून व्यवसाय करताना दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचे नक्की पालन होते का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालणे अवघड होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत अनधिकृत फेरीवाला मुक्त रस्ते व पदपथ धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रमुख रस्ते, अरुंद पदपथ, उड्डाणपुलाखालील जागा तसेच रुग्णालये, शाळा व रेल्वे स्थानकांच्या आसपासचे परिसर अतिक्रमणमुक्त करून नागरिकांसाठी मोकळी व सुरक्षित सार्वजनिक जागा उपलब्ध करून देणे असून अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर व पदपथांवर होणारी गर्दी, वाहतुकीला होणारे अडथळे आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता काही भाग 'फेरीवाला मुक्त क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी सांगत कारवाई तीव्र करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. परंतु त्यानंतरही काही भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाई तीव्र झालेली नाही. नेमक्या दादर, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड तसेच अन्य काही भाग वगळले तरी मुंबईतील काही भागांमध्ये आजही कारवाई होताना दिसत नाही, तसेच याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी कुलाबा कॉजवेवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाने अखेर या अतिक्रमणावर कारवाई केली होती. परंतु दादरमध्ये केवळ ६० टक्केच कारवाई दिसून येत आहे. तर याशिवाय विलेपार्ले,गोरेगाव, वांद्रे पूर्व, कांदिवली, अंधेरी, सांताक्रुझ, ग्रँटरोड, माटुंगा, विक्रोळी, भांडुप, कांजूर मार्ग, चेंबूर आणि गोवंडी भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाई संथ गतीने सुरु आहे.
मुंबईत कुठे आणि कशी कारवाई : न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानक पासून १५० मीटरचा परिसर फेरीवाला मुक्त करणे आवश्यक आहे. तसेच रेल्वे स्थानक परिसर आणि गर्दीची ठिकाणे फेरीवाला मुक्त करण्याचे आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त याचे निर्देश असताना महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस हे जाणीवपूर्वक १०० मीटर पुढील फेरीवाल्यांवर कारवाई करत आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात भाडोत्री फेरीवाला असून १०० मीटरच्या पुढील भागात परंपरागत दोन ते तीन पिढ्या फेरीचा व्यवसाय करणारे आहेत; परंतु या पिढीजात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी मिळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि अधिकाऱ्यांचे हात ओले केले जात असल्याने स्टेशन परिसरता केवळ कारवाईचे नाटक निर्माण करून भाडोत्री फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अप्रत्यक्ष मदत केली जाते. मनसे नगरसेवक आणि महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांनी स्थायी समितीच्या सभेत स्टेशन परिसरात कारवाई व्हावी, पण जे परंपरागत व्यवसाय करत आहेत, जे वसई, कल्याणचा पुढील गावातून भाजी विकण्यास येत आहे आणि ते न्यायालयांच्या निर्देशानुसार १५० मीटरच्या पुढील भागात व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जाते असा सवाल करत त्यांचावर कारवाई करू नये अशी सूचना केली.






