नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका विद्यार्थीनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. पेपरच्या शेवटच्या तासात एका विद्यार्थिनीला अचानक मासिक पाळी सुरू झाली. त्यानंतर तिने तातडीनं वर्गातील परीक्षकांना याबाबत सांगितलं आणि पॅड लावण्यासाठी बाथरूमला जाण्याची विनंती केली. पण परीक्षारक्षकांनी संतापजनक रिअॅक्शन दिली. “पेपर सुरू असताना बाहेर जाऊ देता येत नाही” असे सांगत परिक्षारक्षकांनी परवानगी नाकारली.
या असंवेदनशील निर्णयामुळे त्या विद्यार्थीनीला उर्वरित पेपर तशाच अवस्थेत बसून पूर्ण करावा लागला.पॅड उपलब्ध नसल्याने डाग पडण्याची भीती, मानसिक ताणतणाव यामुळे त्या विद्यार्थीनीला पेपर लिहिण्यास अडथळा निर्माण झाला असावा, अशी चर्चा आहे. नुकतच सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी व्यवस्थापन हा मुलींचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे.तसेच शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याबाबतही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारदेखील मासिक पाळी रजेबाबत सकारात्मक विचार करत आहे.
विद्यार्थिनीच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त
या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ही घटना केवळ एका विद्यार्थिनीची समस्या नसून संपूर्ण व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा अभाव अधोरेखित करणारी आहे. विशेष म्हणजे, पेपर दरम्यान लघवीसाठी परवानगी दिली जाते,मात्र मासिक पाळीसारख्या नैसर्गिक आणि आवश्यक कारणासाठी परवानगी न मिळणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
या घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार शालेय व्यवस्थापन आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या प्रकरणात कोणाही विरोधात वैयक्तिक तक्रार करण्यात आली नाही. ही एक व्यवस्थात्मक त्रुटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे संबंधित परीक्षकांवर कारवाई करण्यापेक्षा संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक संवेदनशील आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याची गरज अधोरेखित होत आहे.