- खासदार श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा; ‘ऑपरेशन टायगर’द्वारे खासदारांचे बळ वाढवण्याचा प्रयत्न
मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत असून, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणखी दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची नावे चर्चेत असून, या संभाव्य विस्तारामुळे दिल्लीतील शिवसेनेचे वजन वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांचे वारे वाहू लागले आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून प्रतापराव जाधव हे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आगामी राजकीय समीकरणे पाहता, शिंदेंच्या पदरात आणखी दोन मंत्रिपदे पडण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
दरम्यान, केंद्रात जास्तीत जास्त मंत्रिपदे पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेकडून खासदारांचा आकडा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून उबाठा गटातील काही खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत खलबते :
नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारासह उबाठा गटातील किती खासदार संपर्कात आहेत आणि आगामी राजकीय रणनीती काय असावी, यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. शिवसेनेने या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी, विस्ताराच्या या हालचालींमुळे महायुतीमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.