मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञानभारतम्’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या अंतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
भारताला प्राचीन काळापासून हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभला असून पारंपरिक ज्ञान पिढ्यान्पिढ्या याच माध्यमातून पुढे आले आहे. मात्र ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने त्यांचे एकत्रीकरण करण्याची गरज ओळखून ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य उद्देश देशभरातील मौल्यवान हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, डिजिटायझेशन आणि जतन करणे हा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय डिजिटल संग्रह उभारण्याचा मानस असून, त्यामध्ये भारताच्या ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखिते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था किंवा व्यक्तीकडेच राहणार असली तरी इच्छुकांनी ती शासनाकडे सुपूर्द करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात या मोहिमेसाठी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे ही क्लस्टर केंद्रे तर आनंद आश्रम संस्थान आणि भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे ही स्वतंत्र केंद्रे म्हणून कार्यरत राहणार आहेत. राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणासाठी विशेष “Gyan Bharatam” मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी आणि दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करून विविध संस्था, ग्रंथालये, धार्मिक ठिकाणे तसेच खाजगी संग्राहक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमात संशोधक, विद्यार्थी, स्वयंसेवक, पारंपरिक विद्वान तसेच वारसा संवर्धन संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, नागरिकांनी आपल्या जवळील हस्तलिखितांची माहिती अॅपवर अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.