मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चिपी विमानतळासाठी १०० टक्के 'व्हिजीएफ' (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) सुविधेला मंजुरी देण्यात आल्यामुळे, आता मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
प्रादेशिक विमान वाहतूक सेवा अधिक सक्षम आणि परवडणारी व्हावी, यासाठी सरकारकडून 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग' दिले जाते. चिपी विमानतळाच्या बाबतीत ही सुविधा १०० टक्के मंजूर झाल्याने, विमान कंपन्यांना कोणताही आर्थिक अडथळा न येता नियमित सेवा देणे शक्य होणार आहे.
फायदा काय होणार?
चिपी विमानतळावरून दररोज सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई आणि सिंधुदुर्गमधील अंतर केवळ तासाभराचे राहणार आहे. याचा सर्वाधिक फायदा पर्यटनाला होणार असून चाकरमानी आणि व्यावसायिकांचीही मोठी सोय होणार आहे. यापूर्वी सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-पुणे या मार्गांसाठीही अशाच प्रकारचा 'व्हिजीएफ' निधी मंजूर करण्यात आला होता.