मुंबई: अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधानसभेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोमवारी सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी संतापाचा प्रक्षोभ व्यक्त केला. "टिप्या आणि औरंगजेबाच्या औलादींना खूश करण्यासाठी शिवरायांचा अपमान करणाऱ्या आव्हाडांना तत्काळ निलंबित करा," असा आक्रमक पवित्रा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी घेतला.
विधानसभेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकासंदर्भात अत्यंत वादग्रस्त विधान केले. "राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र मानून पायाने टिळा लावण्यात आला होता," असे वक्तव्य आव्हाडांनी करताच संपूर्ण सभागृहात संतापाची लाट उसळली.
मंत्री नितेश राणे यांनी या वक्तव्याचा निषेध नोंदवत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "जितेंद्र आव्हाड यांचे हातवारे पहा, त्यांची देहबोली पहा. औरंगजेबाच्या औलादींचे लांगूलचालन करण्यासाठी ते शिवछत्रपतींविषयी अपशब्द वापरत आहेत. हिंदू संस्कृती आणि शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. अशा विकृत मानसिकतेच्या आमदाराचे सदस्यत्व तत्काळ रद्द व्हायला हवे", अशी मागणी त्यांनी केली.
सत्ताधारी आमदारांचा 'वेल'मध्ये उतरून निषेध
नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मंत्री दादा भुसे, शंभूराज देसाई, आमदार योगेश सागर, नारायण कुचे आणि प्रवीण दटके यांनीही आव्हाडांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार 'वेल'मध्ये उतरल्याने वातावरण कमालीचे तापले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून तालिका अध्यक्षांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
...तर आव्हाडांचे निलंबन करणार
सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतरही आव्हाड यांनी सुरुवातीला "केवळ शब्द मागे घेतो" अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माफी मागितल्याशिवाय कामकाज चालू न देण्याचा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी घेतला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यात हस्तक्षेप केला. "यापुढे छत्रपती शिवाजी महाराज किंवा राष्ट्रातील कोणत्याही महापुरुषाबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यास तुमच्यावर नियम ५३ अंतर्गत निलंबनाची कारवाई केली जाईल," अशी तंबी अध्यक्षांनी दिली. या कठोर भूमिकेनंतर आव्हाड यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली.
'हे पाकिस्तानचे सभागृह नाही'
दरम्यान, भाजपचे आमदार योगेश सागर या विधेयकावर बोलत असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी खाली बसून हरकत घेत होते, शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करत होते. त्यावर मंत्री नितेश राणे यांनी हरकत घेतली. ते म्हणाले, "हे काय पाकिस्तानचे सभागृह आहे काय? शरिया कायदा इथे कदापी लागू होणार नाही. खाली बसून बोलणारे आणि हातवारे करणाऱ्यांना सभागृहात मनाई करा", असे म्हणत त्यांनी निषेध नोंदवला.