ठाणे : ठाणे शहराचा कायापालट केला जात आहे. त्यासाठी अनेक पुलांचे डागडुजीचे काम चालू आहे. त्यामुळे ठाणेकरांना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. हे ट्रॅफिकचे संकट आता एप्रिल - मे पर्यंत लांबणार आहे. कारण कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड ते नितीन जंक्शन दरम्यान फिवे ब्रिजच्या कामामुळे बॅरेकेटींग करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची अति गैरसोय होऊ नये यासाठी वाजतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत.
दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पाचमार्गी पुलाच्या कामामुळे काही सेवा रस्त्यांवर तात्पुरती प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १६ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हे निर्बंध लागू राहणार आहेत. ठाणे शहराचे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर पुलाच्या कामासाठी सेवा रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही प्रवेशबिंदू तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
या निर्णयानुसार धर्मवीर कट सेवा रस्त्याने तीन हात नाका येथे जाणाऱ्या बस, जड मालवाहतूक वाहने तसेच इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना मुंबई नाशिक हायवे च्या स्लिप रस्त्याचा वापर करून तिन हात नाका मार्गे पुढे जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय वासुदेव बळवंत फडके (भक्ती मंदिर) येथून सेवा रस्त्यावर डावीकडे वळण घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मोदी हुंडाई कट आणि एच.डी.एफ.सी. कट येथून सेवा रस्त्यावर डावीकडे वळण घेण्यासही परवानगी नसणार आहे. या ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळून धर्मवीर कटमार्गे पुढे जावे लागणार आहे.
दरम्यान, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.