मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळा पूर्व नालेसफाईचे काम हाती घेतले. एरव्ही निविदा विलंबाने झाल्यामुळे कंत्राटदार नियुक्तीनंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये नालेसफाईचे काम होते. परंतु यंदा दोन वर्षांकरता कंत्राटदारांची नियुक्ती झाल्यानंतरही अद्याप मुंबईत नालेसफाईचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे या नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार असा सवाल स्थायी सदस्यांनी केला. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने ५ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्याचा दावा केला, परंतु मुंबईत कुठेही सफाईचे काम सुर झाल्याचे दिसून न आल्याने नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रशासन काही आकडे सांगतले तरी आम्ही आंधळा विश्वास ठेवत नाही, हा सत्ता बदलाचा परिणाम असल्याचे टोलाही सभागृहनेत्यांनी याप्रसंगी लगावला.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीपुढे नाल्यातील गाळ उचलून वाहून नेल्यानंतर त्याचे वजनकाट्यावर मोजमापसह नोंदणी करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवातच झाली नसल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून दिली. सातम यांनी यावर बोलतांना मागील वर्षी २ वर्षांकरता नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांची निवड केली आहे, त्यामुळे मार्चपासून कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि उशिराने नालेसफाईचे काम सुरु झाल्यामुळे पावसात नाल्यातील काढलेला गाळ वाहून गेला. त्यामुळे दरवर्षी मुंबईचे तुुंबई होते, नाले सफाई होत नाही असा जो आरोप होतो, तो यंदा होवू नये तसेच कंत्राटदार नियुक्त असूनही ते काम करत नसतील तर महापालिकेत भाजपची सत्ता आहे हे त्यांना दाखवून द्यायची गरज आहे. यापूर्वी काय चालायचे हे प्रशासनाने विसरुन जायला हवे, आता भाजपची सत्ता आहे लक्षात घ्यावे. त्यामुळे १५ मार्चपर्यंत ज्या कंत्राटदारांनी कामे सुरु केली नसतील त्यांच्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच मिठी नदीतील गाळ काढणारे कंपन्या बाद झाल्यामुळे नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे, ही नेमणूक झाली का याचीही माहिती त्यांनी मागितली.
यावर उबाठाच्या दिपमाला बढे भाजपचे एस विभागातील कंत्राटदार अर्धवट काम सोडून गेला असून त्या जागी नवीन कंत्राटदार कधी नेमणार असा सवाल केला. तर शिवकुमार झा यांनी पोयसर नदीच्या साफसफाईलाही सुरुवात झाली नसल्याचे सांगितले. अजंता यादव यांनी पोयसर नदीमुळे हनुमान नगर वस्तीत पाणी भरते. परंतु या नाल्यातील गाळ न काढता केवळ जेसीबी आणि पोकलेन मशिनमुळे गाळ पुढे मागे केला जातो असे सांगितले. तर तुलिफ मिरांडा यांनीही याला पाठिंबा देत नाल्यातील गाळ काढण्यात झोल होत असल्याचे सांगितले. तर अंजली नाईक यांनी मिठी नदी प्रकरणात कंत्राटदार जेलमध्ये गेल्यामुळे तोच कंत्राटदार एम पूर्व व एच पश्चिम विभागासाठी होता. त्यामुळे या भागातील गाळ काढण्यासाठी कंत्राटदार नाही. त्यामुळे या भागातील गाळ कोण काढणार असा सवाल प्रशासनाला केला.
यावर उत्तर देता अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी तीन जकात नाक्यांच्या ठिकाणी गाळ वजन काटा बसवण्यात आले असून त्यांचा हा प्रस्ताव असल्याचे सांगितले. मात्र मुंबईतील नालेसफाईसाठी २ वर्षांकरता कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. त्यानुसार ५ मार्चपासून काही भागांमध्ये काम सुरु झालेले आहे. काढलेला गाळ ४८ तासांमध्ये सुकल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. त्यामुळे ज्या भागांमध्ये कंत्राटदार सध्या नाहीत तिथे अन्य परिमंडळांमधील कंत्राटदारांवर जबाबदारी सोपवलेली आहे. तसेच एस विभागासाठी कंत्राटदाराची नेमणूक झालेली आहे आणि एम पूर्व व एम पश्चिम विभागासाठी नवीन निविदा प्रक्रिया सुरु आहे. तरी याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांना आपल्या स्तरावर बैठक घेऊन नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्याची सूचना करण्यात येईल असे शर्मा यांनी सांगितले.