- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई : विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांमध्ये असलेल्या घातक घटकांबाबत चर्चा करुन खाद्यरंगांबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. या बैठकीस विधानसभेतील या क्षेत्रातील जाणकार सदस्यांना निमंत्रित केले जाईल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात प्रधानमंत्री मोदी यांना विनंती करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य महेश शिंदे यांनी खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाणारे घातक कृत्रिम रंग वापरले जात असल्याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. सदस्य विक्रम पाचपुते, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दटके, राजेश पवार, हिरामन खोसकर यांनी सहभाग घेतला.
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत असलेले कायदे केंद्र शासनाचे आहेत. या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करुन खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे घातक रंग आणि त्यातील घटक यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रधानमंत्री यांना राज्य शासनाच्या वतीने पत्र पाठवून विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने खाद्य रंगांबाबतचे धोरण ठरविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा करण्यात येईल. राज्य शासनाच्या वतीने सर्व हॉटेल्सना खाद्यपदार्थांच्या मेन्युमध्ये त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सध्या तीन प्रयोगशाळा आहेत, याव्यतिरिक्त आणखी तीन लॅब स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात येईल, असे सांगून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सदस्य महेश शिंदे यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण माहितीची पुस्तिका तयार करावी, विभागामार्फत त्यास साहाय्य करण्यात येईल, असे सांगितले. विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.