मुंबई : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य व्यापी वाहतूकदारांच्या संपा संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली . तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ' महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन ' कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने शासन विचार करित आहे, तरी संप मागे घ्यावा असे आवाहन केले. त्या आव्हानाला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. तसेच , शासन वाहतुकदारांच्या विविध मागण्या संदर्भात संवेदनशील असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले . अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या इ-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल तसेच संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग व पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या आश्वासनानंतर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.