मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील

मुंबई : शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, असे विधान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत केले. कलम २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. चर्चेत सत्तारूढ व विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सहभाग घेतला होता.


राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी महाराष्ट्राने २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर केले असून असे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.


‘माय ॲग्री’ धोरणातून एआय, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर


राज्यात हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ व बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती अधिक जोखमीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाय म्हणून ‘माय ॲग्री’ एआय धोरण आखण्यात आले आहे. या अंतर्गत हवामानाचा अचूक अंदाज, कीड-रोगाचा पूर्व इशारा, सिंचन व खत व्यवस्थापन मार्गदर्शन, बाजारभावाचा अंदाज, पीक उत्पादन वाढ होईल. यासाठी एआय, जनरेटिव्ह एआय, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर होणार आहे. राज्यस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नावीन्य केंद्र स्थापन करण्यात आले असून चारही कृषी विद्यापीठांत एआय संशोधन व इन्क्युबेशन सुविधा उभारल्या जाणार आहेत.


‘महाविस्तार’ ॲपला तीस लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद


कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार’ मोबाईल ॲपचा ३० लाखांहून अधिक शेतकरी वापर करत आहेत. या ॲपद्वारे पीक लागवड, रोगनियंत्रण, पाणी-खत व्यवस्थापन व बाजारभावाची माहिती घरबसल्या मिळते. २२-२३ फेब्रुवारी रोजी मुंबईत ‘AI4Agri’ जागतिक परिषद पार पडली असून त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


पीक विमा, नुकसानभरपाई व अतिवृष्टी मदत


राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील नऊ वर्षांत सुमारे ₹३७,५०० कोटींपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्यात आली आहे. खरीप २०२५-२६ पासून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. ‘बीड पॅटर्न’ ८०-११० मॉडेल राबवून विमा कंपन्यांच्या नफ्यावर वीस टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली आहे. वन्यप्राणी व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली.


फेब्रुवारी ते डिसेंबर २०२५ या काळात अतिवृष्टीमुळे १.३६ कोटी शेतकरी बाधित झाले. १.०६ कोटी हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. यासाठी ₹२०,१९४ कोटींची मदत जाहीर करण्यात आली असून त्यापैकी ₹१५,६६१ कोटी वितरित करण्यात आले आहेत. मदतीची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे.


मोफत वीज, पाणंद रस्ते आणि कर्जमाफी


‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ अंतर्गत साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत आहे. दोन वर्षांत ₹४१,४१५ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना’मार्फत शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ता सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.


इतर महत्त्वाच्या योजना


‘गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना’ अंतर्गत तीन वर्षांत ₹३७४.९२ कोटींचे अनुदान देण्यात आले असून ‘पीएम किसान’ योजनेत १.१९ कोटी लाभार्थी; २१ हप्त्यांत सुमारे ₹३९ हजार कोटी वितरित करण्यात आले आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेत सात हप्त्यांत सुमारे ₹ १३ हजार कोटी वितरित करण्यात आले असून आठवा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे.


गुणवत्ता नियंत्रणात कडक कारवाई


अप्रमाणित बियाणे, खते व कीटकनाशकांविरोधात १४५ फौजदारी कारवाया, ७८५ खटले दाखल, ११६४ परवाने रद्द व १५२७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री भरणे यांनी सभागृहात दिली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली