मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ (National Common Mobility Card) उपक्रमाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेल्या या पावलाला अवघ्या आठवड्याभरातच १ लाखाहून अधिक प्रवाशांनी पसंती दर्शवली आहे. या यशाबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले असून, ही आकडेवारी एसटीच्या आधुनिक प्रवासाची साक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांत एकूण १,००,०२१ प्रवाशांनी या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ‘महिला सन्मान योजने’च्या लाभार्थ्यांचा वाटा सर्वाधिक असून, तब्बल ३७,९२७ महिलांनी नोंदणी केली आहे. त्याखालोखाल ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतील ३४,९४८ नागरिक आणि इतर ज्येष्ठ नागरिकांपैकी २४,९२७ जणांनी डिजिटल प्रवासाला पसंती दिली आहे. तसेच, इतर सर्वसाधारण प्रवाशांनीही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. पारंपारिक रोख व्यवहारांना फाटा देऊन सुरक्षित आणि पारदर्शक प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
तेहरान : मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना इराणची राजधानी तेहरान येथे हवाई हल्ले झाल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले ...
सक्तीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका
दरम्यान, १ मार्चपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत मिळणार नाही, अशा चर्चा समाज माध्यमांवर पसरल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना महामंडळाने सांगितले की, जोपर्यंत किमान ८०% सवलत धारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे कार्ड अनिवार्य केले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तरीही, भविष्यातील सुलभ प्रवासासाठी जवळच्या बसस्थानकावर किंवा अधिकृत एजंटकडे जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. हे 'वन नेशन वन कार्ड' तत्त्वावर आधारित कार्ड भविष्यात इतर सार्वजनिक वाहतूक सेवांसाठीही वापरता येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक 'स्मार्ट' होणार आहे.