मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सुनेत्रा पवार यांची निवड एकमुखानं करण्यात आली. याबद्दलची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली. पटेल यांनीच पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राज्यसभेचे उमेदवार म्हणून केली. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.
राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. त्यासाठी ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. महायुतीचं संख्याबळ पाहता ७ पैकी ६ जागा सत्ताधाऱ्यांना जिंकता येतील. यातील ४ जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १ जागा मिळेल. भाजप आणि शिंदेसेनेनं अद्याप तरी त्यांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे पार्थ पवार यांचे आजोबा, राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारदेखील राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्यांच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही. राष्ट्रवादी शपकडे केवळ १० आमदारांचं बळ आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शपला शिवसेना उबाठा आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागला. या दोन्ही पक्षांकडे मिळून ३६ मतं आहेत.
शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांनीही राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे. दोन्ही पक्ष राज्यसभेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शरद पवारांची अडचण वाढली आहे. सध्या राष्ट्रवादी शपचे राज्यसभेत केवळ दोनच खासदार आहेत. त्यात खुद्द शरद पवार आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. दोघांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. शरद पवार पुन्हा राज्यसभेवर न गेल्यास पक्षाचं वरिष्ठ सभागृहातील अस्तित्व संपुष्टात येईल.
सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांनी अद्याप तरी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पार्थ पवार त्यांच्या जागी राज्यसभेवर जातील, अशी चर्चा होती. सुनेत्रा पवार यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपणार आहे. पण पार्थ पवार त्यांच्या जागी निवडून जाणार नाहीत. २ एप्रिलला ७ जणांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यातील १ जागा पार्थ पवार लढवणार आहेत. त्यामुळे पार्थ पवारांना २०३२ पर्यंतचा कार्यकाळ मिळेल.