Sunday, March 8, 2026

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

बारावीचा पेपर दिला आणि आत्महत्या केली; चिठ्ठीत केले 'ते' खुलासे

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात परीक्षेचा काळ सुरु आहे. वर्षभर अभ्यासासाठी केलेल्या मेहनतीची परीक्षा चालू आहे. लाखोंच्या संख्येने विविध राज्यातून विद्यार्थी पेपर देत आहेत. अशातच आपण नापास होणार या भीतीने घाबरून कल्याणमधील एका मुलीने आपले जीवन संपवले आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात बुधवारी ही घटना उघडकीस आली. संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. नुकतेच दिलेले पेपर अपेक्षेप्रमाणे न झाल्याची खंत तिच्या मनात होती. ‘आपण परीक्षेत नापास होऊ’ या भीतीसोबतच घरच्यांची नाराजी सहन करावी लागेल, या विचारांनी ती तणावाखाली होती, अशी माहिती समोर येत आहे.

परीक्षेच्या निकालाबाबत सतत मनात चाललेल्या भीतीमुळे विद्यार्थिनी मानसिकदृष्ट्या खचली होती. याच अवस्थेत तिने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत विद्यार्थिनीने, “माझे पेपर चांगले गेले नाहीत. मला आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,” असे शब्द लिहिले होते. या ओळींमधून तिच्या मनातील भीती आणि अपराधीपणाची भावना स्पष्ट होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेमुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुण, निकाल आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा