सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. संसदीय कार्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठवावा आणि सभापतींनी हा ठराव एकमताने संमत करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या मागणीवर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ‘‘शासनाला असा प्रस्ताव आणावा लागेल. मी या परिषदेत असा प्रस्ताव मांडतो आणि त्यानंतर सभापतींनी त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा’’, असे त्यांनी नमूद केले.
गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून केंद्रात आणि राज्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांवर चालणारे सरकार सत्तेत आहे. असे असूनही अद्याप विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळालेला नाही. याविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वारंवार खंत व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही या विषयावर भाष्य केले होते. आता विधान परिषदेत ही मागणी झाल्याने सावरकरप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.