Legislative Council Election 2026 : कोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला लॉटरी लागणार ? विधान परिषदेच्या 'या' ९ जागा होणार रिक्त!

मुंबई : येत्या १६ मार्च रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी उडणार आहे. सध्याचे संख्याबळ पाहता, या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. ७ पैकी ६ जागा महायुतीच्या खिशात जाण्याची शक्यता असून, यामध्ये भाजपने सर्वाधिक ४ जागांवर आपला दावा ठोकला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी १ जागा मिळण्याची चिन्हे आहेत.


याउलट, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ १ जागा येताना दिसत आहे. मविआमध्ये एका जागेवरून सध्या जोरदार खलबतं सुरू आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. ही जागा कोणाला द्यायची, यावर अद्याप एकमत झालेले नाही. विशेष म्हणजे, या जागेचा निर्णय घेताना केवळ राज्यसभेचा विचार न करता, भविष्यातील राजकीय गणितेही मांडली जात आहेत.


राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यांत, म्हणजेच मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे मविआचे घटक पक्ष आता 'पॅकेज डील'च्या मानसिकतेत आहेत. ज्या पक्षाला राज्यसभेची संधी मिळणार नाही, त्यांना विधान परिषदेत झुकते माप देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. थोडक्यात, राज्यसभेची ही निवडणूक आगामी विधान परिषद निवडणुकीची नांदी ठरणार असून, दोन्ही निवडणुकांचे जागावाटप एकमेकांशी घट्ट जोडलेले आहे.



'हे' ९ सदस्य १३ मे २०२६ रोजी होणार निवृत्त



  • उद्धव ठाकरे - शिवसेना

  • नीलम गोऱ्हे - शिवसेना

  • अमोल मिटकरी - राष्ट्रवादी

  • शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी

  • राजेश राठोड - काँग्रेस

  • प्रवीण दटके - भाजपा

  • गोपीचंद पडळकर - भाजपा

  • रणजितसिंह मोहिते पाटील - भाजपा

  • रमेश कराड - भाजपा


गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने त्यांच्या विधान परिषदेच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. परिणामी, भाजपा या जागांवर आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना किंवा नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पक्षातील सध्याचे संबंध पाहता, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोटात मोठी उत्सुकता आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची जागा रिक्त होत आहे, त्यामुळे ते पुन्हा सभागृहात दिसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांनी पक्षासाठी एका जागेचा विशेष आग्रह धरला आहे. ही जागा नेमकी कोणाला मिळणार आणि ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार का, याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे.



विधानसभेचे संख्याबळ आणि जागांचे गणित : 


सध्याच्या विधानसभा रचनेनुसार (भाजपा १३२, शिंदेसेना ५७, सुनेत्रा अजित पवार गट ४०) महायुतीचे पारडे अत्यंत जड आहे. विरोधी पक्षात उद्धवसेना (२०), काँग्रेस (१६) आणि शरद पवार गट (१०) यांचे संख्याबळ मर्यादित असल्याने, ९ जागांपैकी बहुतांश जागांवर महायुतीचा विजय सुकर दिसत आहे. सपा, जनसुराज्य आणि इतर अपक्षांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ विधान परिषदेत आणखी वाढणार हे निश्चित आहे. तर दुसरीकडे, विरोधकांना आपल्या अस्तित्वासाठी एकाकी झुंज द्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी