मुंबई : अजित पवार यांच्या निधनाला ४ आठवडे उलटले आहेत. तरीही अद्याप अनेक लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. तर दुसरीकडे अजित दादांचा अपघात की घातपात असा संशय व्यक्त करत आहेत. आता अजित दादांच्या आठवणीत एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सुनेत्रा पवारांचे ट्वीट :
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या. सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती.
दादांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन दिवस-रात्र झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, ही जाणीव उपस्थितांच्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षाने जाणवत होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले, हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे.
दादांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टीतून आखलेला विकासाचा मार्ग आणि लोकहितासाठीची अखंड तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे. त्यांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमाने कार्यरत राहणे, हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
वरळीचा एनएससीआय डोम सोमवारी (२३ फेब्रुवारी) तुडुंब भरला होता. पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून एकत्र आलेल्या राजकीय नेत्यांच्या डोळ्यांतील ओलावा बरेच काही सांगून जात होता. प्रशासनावर असलेली घट्ट पकड, पहाटे ५ पासून कामाला लागण्याची शिस्त, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत उमटवलेला आपला अमीट ठसा... अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा, एका 'लोकनेत्या'चा अस्त झाल्याची भावना सर्वांच्याच मुखी होती. राजकीय क्षितिजावरचा एक धगधगता सूर्य मावळल्याची जाणीव कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून जात होती. "दादा, तुमचा निर्णय चुकला, माघारी या...!" असा हुंदका देताना केवळ राजकीयच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आपले अश्रू आवरता येत नव्हते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक 'आधारवड' कोसळल्याने महाराष्ट्र पोरका झाल्याचीच ही साक्ष होती.
निमित्त होते महाराष्ट्राचे लाडके 'दादा' अर्थात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचे. या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदाणी, अशोक हिंदुजा आणि अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफदेखील आवर्जून उपस्थित होते.