मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र त्या पराभवातून सावरून पुन्हा उभारी घेण्यासाठी अजित पवार यांनी घेतलेले कष्ट मैलाचा दगड ठरले, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी अजित दादांच्या कार्यशैलीचा आणि त्यांच्या जिद्दीचा विशेष उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागल्यानंतर महायुतीत चिंतेचे वातावरण होते. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांनी अधिक आक्रमकपणे जनतेत जाण्याचा निर्णय घेतला. फडणवीस म्हणाले की, "आम्ही सर्वच फिरत होतो, पण या काळात सर्वाधिक प्रवास आणि दौरे अजितदादांनी केले. त्यांनी आपले घर सोडून महाराष्ट्राचा कानाकोपरा पालथा घातला." अजित पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन केवळ सभा घेतल्या नाहीत, तर तिथले आमदार, पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधला. त्यांच्या या सातत्यपूर्ण दौऱ्यांमुळे मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला. पक्षाला आणि युतीला पुन्हा उभारी देण्यासाठी दादांनी दिलेला वेळ आणि केलेले प्रयत्न हे अत्यंत मोलाचे होते, आजपासून सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते
सुनेत्रा वहिनींनी दु:ख बाजूला सारून समाजकार्याचा वारसा स्वीकारला
अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच, त्यांच्या कुटुंबाने आणि विशेषतः सुनेत्रा पवार यांनी ज्या धैर्याने हा कठीण काळ हाताळला, त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून समाजहितासाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सुनेत्रा वहिनींच्या कार्यावर फडणवीस यांनी भाषणादरम्यान प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले की, "दादांच्या जाण्याने कुटुंबावर कोसळलेलं संकट मोठे आहे, मात्र अशाही परिस्थितीत सुनेत्रा वहिनींनी अत्यंत धीरोदत्तपणे कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यंत संयमी आणि घरंदाज पद्धतीने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून, राजकीय क्षेत्रात वैयक्तिक वेदनांपेक्षा कर्तव्याला महत्त्व देणे हे कौतुकास्पद आहे." सुनेत्रा पवार यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास व्यक्त करताना फडणवीस यांनी नमूद केले की, आगामी काळात त्या दादांसारखीच आपली एक स्वतंत्र आणि भक्कम प्रतिमा जनमानसात निर्माण करतील. संपूर्ण महाराष्ट्राच्या सदभावना आणि पाठिंबा त्यांच्या पाठीशी असून त्या जिद्दीने हे काम करतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
संघाचे संस्कार अन् जमिनीवरची कष्ट उपसून 'दादा' घडले
अजितदादांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना इतकी जाण कशी होती, याचा उलगडा देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुरीतील मामांच्या घरचे संघाचे संस्कार ते शेतातील प्रत्यक्ष कष्ट, असा दादांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असल्याचे फडणवीस म्हणाले. अजितदादांचा जन्म राहुरी तालुक्यातील असून त्यांचे बालपण मामांच्या घरी गेले. फडणवीसांनी आवर्जून नमूद केले की, "दादांचे मामा कदम हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारी होते. त्या संस्कारांच्या वातावरणात दादांचे बालपण गेल्याने त्यांना शिस्त आणि कार्याची जाणीव होती." जरी पुढे त्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारांतून राजकारण केले, तरी संघर्षाची बीजे बालपणातच पेरली गेली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर अजितदादा थेट एसी केबिनमध्ये बसले नाहीत, तर त्यांनी मातीत उतरून कामाला सुरुवात केली. फडणवीस यांनी सांगितले की, दादांनी स्वतः टोमॅटोची लागवड केली, दुग्ध व्यवसाय सांभाळला आणि कुक्कुटपालनाचे प्रयोग केले. केवळ उत्पादन घेतले नाही, तर मालाचे मार्केटिंग करणे आणि तो बाजारापर्यंत पोहोचवणे ही सर्व कामे त्यांनी स्वकष्टाने केली. "जमिनीतून उठून मोठे होणे" या शब्दांत फडणवीसांनी दादांच्या कामाचा गौरव केला. शेती आणि व्यापारातील या अनुभवामुळेच त्यांना सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या अडचणींची अचूक माहिती असायची. त्यामुळेच ते प्रशासनावर पकड मिळवू शकले, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.