मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. बारामतीचा तो दुर्दैवी विमान अपघात घडला नसता, तर यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी अजित पवार स्वतः उभे राहिले असते; मात्र नियतीच्या फेऱ्यामुळे आता त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची वेळ सभागृहावर आली आहे.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील गोंधळ म्हणजे कामकाज, असा समज रूढ होत असतानाच्या काळात अजित पवार हे संसदीय कामकाजाचे गांभीर्य आणि नियमावलीबाबत अत्यंत आग्रही असत. वैधानिक कामांबाबत असलेली त्यांची आस्था आणि प्रशासनावरील पकड याची उणीव या अधिवेशनात प्रकर्षाने जाणवणार आहे. शोकप्रस्तावावेळी सर्व पक्षांचे गटनेते आपल्या भावना मांडतील, तसेच प्रत्येक पक्षाच्या तीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाईल. यावेळी सभागृहात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उपस्थिती असणार असल्याने हा क्षण अत्यंत भावूक ठरणार आहे.
वरळीत शोकसभेचे आयोजन
दरम्यान, सोमवारी सायंकाळी वरळी येथील 'एनएससीआय डोम' येथे भव्य सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून राज्यातील आणि देशातील दिग्गज नेते एकाच मंचावर येऊन अजित दादांना अभिवादन करतील. या शोकसभेला सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे.