वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे सात मेमू लोकल रद्द केल्या जाणार आहेत. तर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही फेरबदल करण्यात आला आहे. वसई-विरार आणि पनवेल-दिवा दरम्यान प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी या रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर अवलंबून आहेत. या प्रवाशांना खासगी वाहनांचा किंवा एसटी बसचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यांचे हाल होणार आहेत. त्यामुळे या मार्गावर रेल्वेने प्रवास सुरू करण्याआधी पत्रकाबाबतची ताजी माहिती जाणून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
वसई-दिवा-पनवेल मार्गावरील अनेक मेमू (MEMU) गाड्यांच्या फेऱ्या २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी अर्थात शनिवारी आणि रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६)
१. गाडी क्र. ६१००७: वसई रोड – दिवा मेमू (दुपारी १५:३५ वा.)
२. गाडी क्र. ६९१६६: वसई रोड – पनवेल मेमू (सायंकाळी १६:४० वा.)
३. गाडी क्र. ६१००६: दिवा – वसई रोड मेमू (दुपारी १४:३३ वा.)
४. गाडी क्र. ६९१६१: पनवेल – डहाणू रोड मेमू (संध्याकाळी १९:०५ वा.)
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (रविवार, २२ फेब्रुवारी २०२६)
१. गाडी क्र. ६१००१: बोईसर – वसई रोड मेमू (सकाळी ०८:३५ वा.)
२. गाडी क्र. ६१००२: डोंबिवली – बोईसर मेमू (सकाळी ०५:४९ वा.)
३. गाडी क्र. ६१००३: वसई रोड – दिवा मेमू (सकाळी ०९:५० वा.)
नियमन केले जाईल
ट्रेन क्रमांक 69164 (JCO) दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सुटणाऱ्या डहाणू रोड- पनवेल मेमूचे कामन रोडवर १० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.
ट्रेन क्रमांक 22178 (JCO) दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद - राजकोट एक्स्प्रेसचे भिवंडी रोड येथे १ तास ३० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
२१ फेब्रुवारी रोजी सुटणारी सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस भिवंडी रोड स्थानकावर दीड तास थांबवून ठेवण्यात येणार आहे. तर २१ फेब्रुवारी रोजी वेरावळ येथून सुटणारी वेरावळ – पुणे एक्सप्रेस नियोजित वेळेऐवजी १४:३५ मिनिटांनी सुटणार आहे. तर इंदूरहून सुटणारी इंदूर – दौंड एक्सप्रेस सायंकाळी १८:३० वाजता प्रस्थान करेल.
रेल्वेच्या संरक्षक भिंतीच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) प्रकल्पांतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वसई रोड विभागात असलेल्या खारबाव स्टेशनवर नवीन अप आणि डाउन मालगाडी मार्गाचे काम सुरू असल्याने, इंदूरसह रतलाम विभागात जाणाऱ्या काही गाड्या शनिवार २१ फेब्रुवारी रोजी उशिराने धावणार आहेत.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २२९४४ इंदूर एक्सप्रेस ही गाडी २१ फेब्रुवारी रोजी इंदूर स्थानकावरून सुमारे दोन तास उशिराने निघेल. याव्यतिरिक्त, १२९४० जयपूर पुणे एक्सप्रेस ही गाडी जयपूर स्थानकावरून सुमारे तीन तास उशिराने निघेल आणि २२६५३ तिरुवनंतपुरम निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी तिरुवनंतपुरमवरून सुमारे ३:३० तास उशिराने निघेल.
भारत सरकारची कंपनी DFCCIL, मालवाहतूक जलद करण्यासाठी आणि प्रवासी रेल्वेचे कामकाज सुलभ करण्यासाठी मालवाहतूक गाड्यांसाठी समर्पित रेल्वे कॉरिडॉर विकसित करत आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वेने प्रवास सुरू करण्याआधी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रकाबाबतची ताजी माहिती जाणून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वेचा रतलाम विभाग इंदूर आणि आसपासच्या भागात रेल्वे रुळांभोवती ट्रॅक-साइड कुंपण (सीमा भिंत/सुरक्षा कुंपण) वेगाने बांधत आहे. यामुळे गाड्या आणि प्रवाशांचा वेग, सुरक्षितता आणि सुरक्षा आणखी वाढेल. इंदूर-देवास-उज्जैन-भोपाळ विभागात वंदे भारत ट्रेनचा विचार करून संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. तसेच इंदूरमध्ये डॉ. आंबेडकर नगर ते खंडवा, मंदसौर ते इंदूर, उज्जैन ते देवास ते इंदूर रेल्वे विभागांमध्ये संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. या रेल्वे विभागांवर तसेच रतलाम विभागातील काही इतर रेल्वे विभागांवर एकूण ५०१ किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर सीमा भिंती प्रस्तावित आहेत. याआधी २०२४ मध्ये १२७ किलोमीटर आणि २०२५-२६ मध्ये अंदाजे ८० किलोमीटर लांबीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.