मुंबई: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे आणि याच हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस हवामानात सतत बदल राहतील. उकाडा अधिक जाणवेल. १ जानेवारी २०२६ रोजी राज्यासह देशातील अनेक भागात मोठा पाऊस झाला. या अवकाळी पावसानंतर राज्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. आता राज्यातून जवळपास थंडी गायब झाली आहे. सकाळच्या वेळी थोड्या प्रमाणात गारवा जाणवतो पण दिवसभर उष्णता जाणवते. थंडी कमी झाली आणि उन्हाचा चटका जाणवत असला तरीही वायू प्रदूषण अजून काही कमी झाले नाही. वायू प्रदूषण सातत्याने वाढताना दिसत आहे.
उन्हाचा चटका वाढला असला तरीही राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण राहिल. आज राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होईल. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे १३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे ३५.७ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. बांदा येथे ८.२ सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. देशातील उच्चांकी तापमानाची नोंद केरळ येथे झाली असून केरळ येथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र, थंडी बऱ्यापैकी गायब झाली असली तरीही अजून पावसाचे संकट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, जम्मू आणि कश्मीरमधील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच दिल्लीसह मुंबईतही प्रदूषण वाढताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करता दिल्लीतील प्रदूषण बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. पण मुंबईतील प्रदूषणात सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे.