दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उड्डाणपूलाच्या कामांत दिरंगाई
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम अपेक्षित गतीने सुरू न ठेवल्याप्रकरणी संबंधितकंत्राटदारास ५० लाख रूपयांच्या दंडाची आकारणी करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान,या उड्डाणपुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची कुमक वाढवावी. ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा, असे निर्देशही बांगर यांनी दिले आहेत.
गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान १.२६ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, विविध निर्देश दिले. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम, कार्यकारी अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह महानगरपालिका अभियंते, सल्लागार यावेळी उपस्थित होते.
दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. दिंडोशी न्यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, ३१ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तसेच, एकूण ३० पैकी २० स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १० स्पॅनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. खांबांवर तुळई स्थापित करणे, डेक स्लॅब ओतकाम, पोहोच मार्ग आदी कामांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक तेवढे मनुष्यबळ व इतर यंत्रणा यांची अधिक कुमक उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश वेळोवेळी देण्यात आले आहेत. ३१ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. तथापि, कंत्राटदाराने ठरविलेल्या वेळापत्रकाचे पालन न केल्याचे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्पष्ट झाले. उड्डाणपुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू राहिल्याप्रकरणी कंत्राटदाराकडून ५० लाख रुपयांचा दंड आकारावा, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उड्डाणपूल उतरतो, त्या ठिकाणी पोहोच रस्ता केला जाणार आहे. मात्र, या मार्गात जलवाहिन्या, सांडपाणी नाला आणि अदाणी पॉवर यांचे विद्युत परिवर्तक (ट्रान्सफॉर्मर) अडथळा ठरत आहे. त्यांचे तातडीने स्थलांतरण / नव्याने बांधणी करावी, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले आहेत.