मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागाने ७५ शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याचा प्रताप केला. त्याची राज्य सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये मंत्रालयातील एका उपसचिवाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. "ज्यांनी कोणी या प्रक्रियेत अनियमितता किंवा गडबड केली असेल, त्यांची गय केली जाणार नाही," असा इशारा मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दिला.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण राज्य या धक्क्यातून सावरत असतानाच, अल्पसंख्याक विकास विभागाने मागील ऑगस्टपासून प्रलंबित असलेली ७५ प्रमाणपत्रे अवघ्या काही तासांत वितरित केली. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रमाणपत्रांना तात्काळ स्थगिती दिली असून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी 'मुंबई सज्ज'
मुंबईत मंगळवारपासून देशातील पहिली ‘मुंबई क्लायमेट वीक’ परिषद जिओ वर्ल्ड सेंटर येथे सुरू झाली. महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, "हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) सामना करताना हवेची आणि पाण्याची गुणवत्ता सुधारून 'लाईफ क्वालिटी' उत्तम करणे हे आमचे लक्ष्य आहे. ही परिषद दरवर्षी मुंबईत आयोजित केली जाईल." या परिषदेसाठी ३५ देशांतील प्रतिनिधी उपस्थित आहेत.
‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन’चा शुभारंभ
शेती क्षेत्रावर होणारा हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी काही प्रभावी मॉडेल्स आणि स्टार्टअप्स या परिषदेत पुढे आले आहेत. याचा राज्यातील बळीराजाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुंबईत ‘ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन’ या तीन दिवसीय शिखर परिषदेचाही प्रारंभ झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता आणि नव्या पुरवठा साखळ्या निर्माण करण्याच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जगभरातील मान्यवर नेते या मंचावरून पुढील तीन दिवस विचारमंथन करणार आहेत.