"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आयोजित संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संत सेवालाल महाराजांसह सर्व संतांना वंदन केले तसेच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतींनाही अभिवादन केले.


अलीकडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद घटनेमुळे कार्यक्रम साधेपणाने घेतल्याचे सांगत त्यांनी देशभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या बंजारा समाजाचे स्वागत केले व समाजाची एकजूट हीच खरी ताकद असल्याचे नमूद केले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभहस्ते बंजारा समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना 'सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.


पोहरादेवी ही संत सेवालाल महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून येथे आल्यावर वेगळी आध्यात्मिक ऊर्जा मिळते, असे सांगताना त्यांनी हा संपूर्ण परिसर मोठे आध्यात्मिक व पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री असताना या विकास आराखड्यास ७२४ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची आठवण करून देत सेवालाल महाराज स्मारकासह सर्व कामे वेगाने पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे विरासत संग्रहालयाचे उद्घाटन झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हे स्मारक भविष्यात समाजाला व कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देणारे ठरेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.





बंजारा समाज हा निसर्गपूजक, मातीत इमान राखणारा आणि राष्ट्रभक्त समाज असून इतिहासात या समाजाने देव, देश आणि धर्मासाठी बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले.


अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आणि एकजुटीने लढणारा समाज म्हणून बंजारा समाजाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.


रामराव महाराजांच्या प्रसंगाचा उल्लेख करत मानवसमता व अहिंसेचा संदेश या परंपरेत असल्याचेही त्यांनी नमूद केले. समाजाने शिक्षण घ्यावे, एकत्र राहावे व आपली संस्कृती जपावी, असे आवाहन त्यांनी केले.


सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान व विमा योजना तसेच अतिवृष्टी मदत अशा निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगनिर्मिती व रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असून मुंबईत बंजारा समाज भवनासाठी जागा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन झाल्याने लवकरच सकारात्मक मार्ग निघेल व समाजाला न्याय मिळेल, असा पुनरुच्चार करत मेहनत, एकजूट आणि स्वाभिमान कायम ठेवण्याचे आवाहन करून त्यांनी ‘जय सेवालाल महाराज’च्या घोषणांनी भाषणाची सांगता केली.


या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, खासदार संजय देशमुख,


जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायजिंग महाराज, गोपाल महाराज यांच्यासह बंजारा समाजातील अन्य मान्यवर पदाधिकारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे–कोल्हापूर प्रवासाला वेग; राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

पुणे : पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा रस्तेप्रवास लवकरच अधिक जलद आणि सुलभ होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक

Satara: 'व्हॅलेंटाईन डे'ला चक्क शिक्षकाने विद्यार्थिनीला केला प्रपोज; 'तू का आली नाहीस म्हणत...'

सातारा: सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात 'व्हॅलेंटाईन डे' ला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी

Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका

JEE Main 2026 Session 1 Result: जेईई मेनचा निकाल आज जाहीर होणार, 'या' वेबसाईटवर पाहू शकता अपडेट्स

JEE Main 2026 Session 1 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आज जेईई (मेन) २०२६ सत्र १ चा (JEE Main 2026 Session 1) निकाल जाहीर करणार आहे. मूळ निकाल १२

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त