मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शौर्याचा आणि त्यांनी निर्माण केलेल्या पवित्र हिंदवी स्वराज्याचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हजारो हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या, मंदिरांचा विध्वंस करणाऱ्या आणि माता-भगिनींवर अत्याचार करणाऱ्या क्रूरकर्मा टिपू सुलतानाची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट शिवछत्रपतींशी केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मालेगाव महापालिकेतील टिपूच्या छायाचित्रावरून सुरू असलेल्या वादात सपकाळ यांनी उडी घेत हे विषारी विधान केले आहे.
बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवून स्वराज्याचा विचार दिला, त्याच मांदियाळीत टिपू सुलतान येतो. टिपूने इंग्रजांविरुद्ध लढा दिला, तो या भूमीचा पुत्र होता. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतानाकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे", असे संतापजनक विधान त्यांनी केले.
महाराष्ट्र भाजपने सपकाळ यांच्या विधानाचा निषेध नोंदवत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “हिंदुद्वेषी आणि क्रूर टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून काँग्रेसने आपली 'मुघली विचारधारा' महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. निष्पाप हिंदूंची कत्तल करणाऱ्या आणि हिंदू स्त्रियांचा छळ करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केली पाहिजे, असे विधान काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करत आहे. गेल्याच आठवड्यात तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर बुलडोझर फिरवला होता. पंडित नेहरूंपासून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करण्याची मुघली परंपरा काँग्रेस पुढे नेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्या औरंगजेबप्रेमी काँग्रेसला जनता नक्कीच धडा शिकवणार”, अशी टीका भाजपने केली आहे.
टिपूचा काळा इतिहास काँग्रेसला मान्य आहे का?
ज्या टिपू सुलतानाची तुलना सपकाळ शिवरायांशी करत आहेत, त्याचा इतिहास रक्ताने माखलेला आहे. टिपूने शेकडो निष्पाप ब्राह्मणांना फासावर लटकवले. हजारो हिंदू मंदिरांचा विध्वंस करून तिथे मशिदी उभारल्या. लाखो हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले. हिंदू स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांना आपल्या जनानखान्यात डांबले. अशा 'हिंदुद्वेषी' आक्रमकाचे उदात्तीकरण करून काँग्रेसने महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.