मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विवेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भक्तगण आणि अनुयायांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र तळागाळात गेले पाहिजे, यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतित केले. सोपी, रसाळ आणि लोकांना खिळवून ठेवणारी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यातून अनेक तरुणांना आयुष्याची दिशा मिळाली. राष्ट्रभक्त पिढी निर्माण करण्याचे काम त्यांच्या हातून घडले. छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि गुरुमंदिर परिवार हा त्यांचा मोठा परिवार होता. अनेक ग्रंथांची, काही नाटकांची निर्मितीही त्यांनी केली. संत साहित्याचाही त्यांचा अतिशय गाढा अभ्यास होता. रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, श्री गुरुचरित्र यावर त्यांचे प्रभुत्त्व होते. अनेक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या चाहत्यांच्या विशाल परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.