मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत मागील ०८ मार्च २०२२ पासून सुरु असलेली प्रशासक राजवट अखेर बुधवारी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक ११ फेब्रुवारी रोजी होत असल्याने या पहिल्या सभागृहापासून प्रशासकाची नियुक्ती संपुष्टात येईल असे नमुद केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासक डॉ भूषण गगराणी हे आता प्रशासक ऐवजी आयुक्त म्हणूनच कार्यभार सांभाळणार आहेत . महापालिकेत प्रथमच ३ वर्षे ११ महिन्यांचा कालावधीत प्रशासक राजवट होती आणि महापालिकेतील ही सर्वांत मोठी प्रशासक राजवट महापालिकेच्या पहिल्या सभागृहानंतर संपुष्टात येणार आहे.
मुंबई महापालिकेत सन २०१७मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी हा ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकारने महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ . इक्बाल चहल यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर चहल यांची बदली झाल्यानंतर त्यांच्य जागील डॉ भूषण गगराणी यांची प्रशासक तथा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. नगरविकास खात्याच्यावतीने महापालिका प्रशासक पदी नियुक्ती करताना ही नियुक्ती महापालिकेच्या पहिल्या सभागृहापर्यंत सिमित असेल अशाप्रकारची अट घालण्यात आली होती. त्यानुसार आता प्रशासकाचा कालावधी पहिल्या सभागृहानंतर म्हणजे महापौर निवडीनंतर संपष्टात येत आहे.
मुंबई महापालिकेत एप्रिल १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीमध्ये प्रशासक नियुक्त होते. १३ महिन्यांच्या प्रशासक कालावधीमध्ये द.म.सुखटणकर आणि जे.जी.कांगा हे प्रशासक नियुक्त होते. त्यानंतर मुंबई महापालिकेत सन ८ मार्च २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये प्रशासक नियुक्त आहे. मागील तब्बल ३ वर्षे ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये हे प्रशासक नियुक्त असल्यामुळे महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती होता. महापौरांसह वैधानिक समिती तसेच विशेष समिती अध्यक्षांचा कारभार हा प्रशासकांच्या हाती होता आणि प्रत्येक प्रस्तावाला प्रशासक हे मंजुरी देत असत. पण आता महापौर निवडीनंतर प्रशासकांचे हे सर्व अधिकार निघून जाणार असून सुमारे चार वर्षांनंतर नगरसेवकांच्या हाती महापालिकेचा कारभार येणार आहे.